Wednesday, November 22, 2017

वेशीवरच्या पाऊलखुणा : हट्टी गाव : रमेश पडवळ

संस्कृती जोपासण्यासाठी `ते’ झाले हट्टी !

परदेशी आक्रमणे आणि कालांतराने होत असलेल्या बदलांमध्ये अनेक संस्कृती, प्रथा व परंपरा वाहून जातात. मात्र महाराणा प्रतापांच्या भूमीतून लढायांदरम्यान चारशे-पाचशे वर्षांपूर्वी नाशिकमध्ये आलेले लोक येथेच स्थिरावले; पण त्यांनी त्यांची संस्कृती, प्रथा व परंपरांना हट्टाने आपल्यातून जीवंत ठेवले. महाराष्ट्राशी, नाशिकशी एकरूप होताना आपल्यातील वेगळेपणाही हट्टी होऊन जपला. हे गाव अजूनही एकमेकांशी हिंदीतून संवाद साधते. अनेक परंपरा मूळ राजस्थानी पद्धतीनेच जपते! या गावाच्या प्रवासाच्या ऐतिहासिक पाऊलखुणा ठसठशीत नसल्या तरी त्या आपल्याशीही संवाद साधतात अन् आम्ही ‘हट्टी’ आहोत, असे सांगत राहतात.
                                                                                                    रमेश पडवळ

आपल्या संस्कृती आणि परंपरांविषयी हट्टी असलेल्या लोकांच्या गावाचे नावही हट्टी असेच आहे. नावात हट्ट असल्याने त्यांच्यातील वेगळेपणा जाणवायला लागतो. हट्टीगाव चांदवड तालुक्यात येते. पण वणीपासून (ता. दिंडोरी) 15 किलोमीटरवर हे गाव आहे. धोडप (धारपवणिक) किल्ल्याच्या पायथ्याशी हे गाव चारशे-पाचशे वर्षांपासून वसले आहे. गावात राजपुतांची 60-70 कुटुंब असून गावची लोकसंख्या साधारण हजार आहे. एक-दोन कुटुंब सोडली तर सर्व घरे राजपुतांची आहेत. राजस्थान येथील चितोडगड हे त्यांचे मूळ. महाराणा प्रतापांच्या राज्यविस्तारादरम्यान त्यांच्या सोबत आलेल्या कबिल्यांनी धोडपच्या पायथ्याशी असलेल्या अंमरापूर या गावात आश्रय घेतला, असे म्हटले जाते. महाराणा प्रतापांच्या मृत्यूनंतर (1597) मुस्लिम आक्रमणे व अत्याचार वाढल्याने चितोडमधील अनेक राजपूत सुरक्षित ठिकाणाच्या शोधात धोडपच्या पायथ्याशी आल्याचे म्हटले जाते. त्यांची आडनावे सिसोदिया, गेहरवाल, बायस, चौहान, शेखावत अशी आहेत. मात्र येथे आल्यावर येथील लोकांच्या दृष्टीने ते परदेशी होते. त्यामुळे त्यांना परदेशी म्हटले जाऊ लागले. त्यामुळे येथील प्रत्येक कुटुंबाचे आडनावही परदेशी आहे. मात्र त्यांचे मूळ आडनाव वेगळे असल्याने त्यानुसार परदेशी परदेशींमध्ये रोटीबेटी व्यवहार होतात.
धोडप किल्ल्याची चढाई जेथून सुरू होते तेथे एक हनुमानाची साधारण चार फूट उंचीची मूर्ती आहे. हा हनुमान अंमरापूर या गावातला. हनुमानाचे पक्के मंदिर नाही पण आजूबाजूला पाहिले की येथे पूर्वी गाव होते हे लक्षात येते. अंमरापूरच्या आजूबाजूला अनेक गावे होती; पण कालांतराने ती नाहीशी झाली. त्याच्या खाणाखुणा तेथे पाहायला मिळतात. पूर्वी राजपूत लोक या गावात राहायचे, पण त्यांनी अंमरापूरपासून वेगळे व्हायचे ठरविले अन् ते खालच्या बाजूला वसले. त्यांच्या या हट्टीपणामुळे त्यांना हट्टी म्हटले जाऊ लागले अन् त्या गावचे नावच हट्टी पडले, असे म्हटले जाते. त्यांचा हट्ट त्यांच्या संस्कृतीशी होता अन् अजूनही आहे. ही सर्व कुटुंब एकमेकांशी हिंदीत बोलतात. त्यांचे शिक्षण मराठीतून होते, ते आता मुख्य प्रवाहातही आले आहेत. गावातील अनेक मुले प्राध्यापक, शिक्षक व चांगल्या नोकऱ्यांमध्ये आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी ते एकरूप झाले आहेत; पण काही मुळं खोल रोवली गेली आहेत. त्यात भाषेचा समावेश होतो.
`आम्हाला मराठी चांगले बोलता, लिहिता व वाचता येतं. आमची मुलं मराठी शाळेतूनच शिक्षण घेतात पण घरात आम्ही एकमेकांशी हिंदीतूनच बोलतो. याबाबत कसलाही लिखित नियम नाही. पण हे ओघाने होते,’ असे शिक्षक असलेले सुभाष परदेशी सांगतात. या कुटुंबियांचा पेहराव, अगदी घरातील देवघर व त्यातील देव सर्व काही मराठी पद्धतीचेच दिसते. गावात हनुमान मंदिर, महादेव मंदिर, गोरक्षनाथ मंदिर, शनी मंदिर इतर देवतांची लहान मोठी मंदिरे असून, त्याच्या देखभालीची जबाबदारीही गावकरीच घेतात. हट्टीगावातच खडेश्वर बाबांचा आश्रमही आहे. खडेश्वर बाबांचे मूळ नाव हेमाराम. तेही राजस्थानचेच आहेत. ते स्वत:ला महाराणा प्रतापांच्या सैन्यातील एक मानतात. तेरा वर्षांपूर्वी त्यांना आपली कर्मभूमी धोडप असल्याचा साक्षात्कार झाला अन् तेव्हापासून ते येथे आल्याचे सांगतात. ते कधीही पाठ टेकवित नाहीत. उभ्यानेच झोपतात म्हणून त्यांना खडेश्वर बाबा नाव पडले. हट्टीतील कुटुंबाचा मुख्य व्यवसाय दुधाचा आहे. नाशिकला दररोज ४०० किलो खवा पुरविण्याचे काम हट्टी व आजूबाजूची गावे करतात. हट्टीगावचा खवा गुलाबजामसाठी प्रसिद्ध आहे. दुधाच्या व्यवसायासह आता हट्टीतील कुटुंब शेतीकडेही वळली आहेत. गावात फूड प्रोसेंसिंगचे दोन कारखाने आहेत त्यामुळे रोजगाराला हातभार लागला आहे.
हट्टीतील परदेशी राजपुतांची कुलदेवता अजमेरची शाकंबरी माता ही आहे. या मातेचा उत्सव ते साजरे करतात. तसेच संत मिराबाईचा पुण्यतिथी सप्ताह सोहळाही गावात होतो. पूर्वी हट्टीमध्ये बोहाडेही व्हायचे, मात्र ही परंपरा कालांतराने मागे पडली. येथील अनेक कुटुंबांमध्ये बोहाड्यांची पात्रे परंपरेने नाचविली जायची. मात्र आता फक्त लग्नांमध्ये सोंगे नाचविली जातात; पण ती फक्त सोहळ्याचा भाग म्हणूनच. हट्टीत लग्नाचा कार्यक्रम तब्बल पाच दिवस चालतो. आता तो दोन दिवसांवर आला आहे. मात्र लग्नात म्हणजे भवरी साजरी करण्यात हट्टी गावचे लोक प्रचंड हट्टी आहेत.
मंगनी, कुंमकुंम सोहळा, हलदी, रथयात्रा, मंडवा, देवप्रतिष्ठान, लेलचवजा, बारात, सातफेरे, बिदाई असा भरगच्च कार्यक्रम म्हणजे त्यांचा लग्नसोहळा असतो. रथजत्रा म्हणजे तेथील महिला कुलदेवतेची आराधना करतात. मात्र इतर सर्व सण व उत्सव हे महाराष्ट्र पद्धतीनेच साजरे केले जातात. लग्नात नवरदेवाकडे कट्याराऐवजी तलवार असते. या तलवारीला महाराणा प्रतापांची तलवार म्हटले जाते, असे येथील ज्येष्ठ राजाराम सिंग-परदेशी सांगतात. लग्नातील सर्वात महत्त्वाची गंमत म्हणजे हट्टीतील लग्न पूर्वी पहाटे चार वाजता लागायची. अजूनही ती लागतात. यात बदल होत आहे, मात्र इंग्रजांच्या जाचामुळे दिवसा सण, उत्सव साजरा करता येत नव्हते, त्यामुळे पहाटे पहाटे असे सोहळे साजरे करण्याची पद्धत ‌पडली, असेही म्हटले जाते.
हट्टीगावची एक वेगळी ओळख म्हणजे सात एकर क्षेत्रावर होत असलेले निसर्ग पर्यटन केंद्र व धाडसी खेळांचे केंद्र. निसर्ग पर्यटन केंद्र, उपाहारगृह, अॅडव्हेंचर स्पोर्टस्‌ कॅम्पस, पर्यटकांच्या मुक्कामासाठी सेजगृहे, तसेच तंबूची व्यवस्था करण्यात येत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या नव्या पर्यटन केंद्रामुळे येथील गाइड (वाटाड्या) म्हणून व अॅडव्हेंचर स्पोर्टस्‌ अॅक्‍टिव्हिटीजमध्ये हट्टी गावातील युवकांनी पुढाकार घेतला आहे. यामुळे पर्यटकांचा ओढा या गावाकडे वाढला आहे. धोडपला जाणार प्रत्येकजण हट्टी गावात काही काळ स्थिरावतो. पुरातत्त्व विभागाने धोडपच्या पायथ्याशी उत्खनन केले, तर मोठा इतिहास समोर येईल. किल्ल्यावरील गवळीवाडीतील ताम्रपटांचे वाचनही व्हायला हवे. हे ताम्रपट निजामकाळातील आहेत. हट्टी परिसरात अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. याचाही अभ्यास होण्याची गरज आहे. हट्टीगाव आपल्या वेगळेपणातून संस्कृतीच्या पाऊलखुणा जपण्याचा प्रयत्न करीत असल्याने ते वेगळे भासते.

राज्यसभेच्या नवनिर्वाचीत खासदारांचा 22 जुलैला शपथविधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :   येत्या 22जुलै रोजी राज्यसभेत नवनिर्वाचिक राज्यसभा खासदारां च्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज...