संघर्षाचे नव्हे तर सहमतीचे राजकारण कसे करावे हे वाजपेयींनी दाखवून दिले. मोरारजी देसाई,एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर, व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आघाडी सरकारे स्थापन झाली पण ती अस्थिर होऊन कोसळली. बिगर काँग्रेसचे आघाडी सरकार यशस्वी करून दाखवणारे वाजपेयी हे देशातले पहिले नेते होते….
भारतीय जनता पक्ष जो काही आहे तो अटल बिहारी वाजपेयींमुळे. जनता पक्षातून बाहेर पडून 1980 मधे वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी पुढाकार घेऊन भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. 1984 मधे पक्षाने पहिल्याच लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अवघे दोनच खासदार निवडून आले होते. पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांचाही त्यावेळी दारूण पराभव झाला होता. अवघ्या दोन खासदारांपासून या पक्षाची सुरूवात झाली आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 282 खासदार निवडून आले. भाजपला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले ही किमया जरी मोदी लाटेची होती तरी या पक्षाचा पाया वाजपेयींनी रचला आहे, पक्षाच्या पाठिशी वाजपेयींची पुण्याई आहे, वाजपेयींचे परिश्रम, राजकीय कौशल्य व मुत्सद्दीपणा आहे.वाजपेयींचे सर्वसमावेशक नेतृत्व हे सर्वात महत्वाचे आहे. पक्षाच्या विस्तारामागे वाजपेयींचे अमोघ वक्तृत्व आणि संघटन कौशल्य आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे विद्यमान कारभारी असले तरी त्यांच्या कामाची तुलना ही वाजपेयी- अडवाणींच्या कारकिर्दीशी केली जाते.
वाजपेयी हे सार्वजनिक जीवनातील उत्तुंग व्यक्तिमत्व होते. ते सर्वांना हवेसे वाटायचे. ते खूप मोठे नेते आहेत पण चुकीच्या पक्षात आहेत असे काँग्रेसच्या मोठ मोठय़ा नेत्यांनी बोलून दाखवले आहे. वाजपेयी हा पक्षाचा मुखवटा आहे, असे गोविंदाचार्य यांनी स्वतःच म्हटले होते. काँग्रेससह विरोधी पक्षांनी वाजपेयांना नेहमीच आदर दिला पण भाजपची भूमिका व धोरणे त्यांना मान्य नसत. केंद्रात एनडीए ( राष्ट्रीय लोकशाही आघाडी ) चे सरकार स्थापन झाले ते वाजपेयींमुळेच. एनडीएची निर्मिती आणि बिगर काँग्रेस सरकारची स्थापना केंद्रात झाली त्याचे श्रेय केवळ वाजपेयींना जाते. द्रमुक, अण्णा द्रमुक, तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, तेलगु देशम, आसाम गण परिषद, समता पक्ष अशा चोवीस पक्षांची मोट बांधून केंद्रात एनडीचे सरकार चालले ते वाजपेयींच्या नेतृत्वामुळेच. भाजप हा जरी लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता तरी एनडीए चे सरकार चालवण्याची क्षमता असलेला दुसरा नेता या पक्षात नव्हता हे वास्तव आहे. काँग्रेस विरोधी प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याची किमया वाजपेयींनी करून दाखवली आणि अनेक आंतर बाह्य संकटे येऊनही त्यांनी पाच वर्षे देशाला स्थिर सरकार दिले.
बाबरी मशिद उध्दवस्त झाल्यावर 1996 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप निवडून आला होता. सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रपतींनी भाजपला केंद्रात सरकार बनवण्याची संधी दिली. बाबरी पाडणारा पक्ष म्हणून भाजपपासून त्या काळात अन्य राजकीय पक्ष दूर असायचे. शिवसेना आणि अकाली दल हेच केवळ भाजपचे नैसर्गिक व जुने मित्र भाजपबरोबर होते. बहुमत नसल्याने वाजपेयींचे सरकार अवघ्या तेरा दिवसात कोसळले. 1998 च्या निवडणुकीत पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले. त्यात वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष होते. जयललिता यांनी सतत दबावाचे राजकारण चालवले आणि सरकारचा पाठिंबा काढून घेतला. वाजपेयी सरकारला अविश्वासाच्या ठरावाला लोकसभेत सामोरे जावे लागले. आदल्या रात्री मायावतींनी शब्द फिरवला व सरकारला विरोध करण्याचा निर्णय घेतला त्याचा परिणाम वाजपेयींचे दुसरे सरकार अवघ्या तेरा महिन्यात कोसळले व पुन्हा देशाला मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागले. 1999 च्या निवडणुकीत पुन्हा भाजपच सर्वात मोठा पक्ष निवडून आला व वाजपेयींच्या नेतृत्वाखाली तिसर्यांदा सरकार स्थापन झाले. चोवीस घटक पक्षांना बरोबर घेऊन एनडीएचे सरकार त्यांना पाच वर्षे यशस्वीपण oचालवून दाखवले.
वाजपेयी जरी संघ परिवारातून आले होते तरी त्यांनी हिंदुत्व हिंदुत्व म्हणून कधी बँड वाजवला नाही. भाजपचे नेते म्हणून ते उजव्या विचारसरणीकडे कधी टोकाला झुकले नाहीत. कट्टरपंथी म्हणून त्यांनी कधीच कोणी संबोधले नाही. आघाडी सरकारचा धर्म पाळताना संघाची विचारसरणी त्यांनी कधी आड येऊ दिली नाही.
वाजपेयींनी एनडीए सरकार कसे चालवले म्हणून आज अनेक मित्र पक्ष मोदी- शहांना आठवण करून देतात. पण वाजपेयींच्या काळात भाजपला लोकसभेत कधीच निर्विवाद बहुमत मिळालेले नव्हते. त्या काळात पक्षाचे महाप्रचंड मार्केटींग नव्हते. जाहीरातबाजी नव्हती. इव्हेंट चे फॅड नव्हते. धुव्वाधार पैशाचा खेळही नव्हता. सर्वात महत्वाचे जुमलेबाजी तर पक्षात मुळीच नव्हती.
भाजप हा स्वदेशी चा पुरस्कर्ता. भाजपशी संलग्न असलेली स्वदेशी जागरण मंच ही संघटना आवाज उठवत असते. पण नरसिंह राव हे पंतप्रधान असताना त्यांनी घेतलेल्या आर्थिक सुधारणा व उदारीकरणाच्या धोरणाला वाजपेयी यांनी विरोधी पक्षाच्या बाकांवरून पाठिंबा दिला होता. जग कुठे चालले आहे, जगाने आर्थिक धोरणाची दिशा काय स्वीकारली आहे, याचे भान त्यांना होते. आर्थिक सुधारणेला संघाने व स्वदेशी मंचाने विरोध केला होता. टीका चालू असताना वाजपेयींनी आपले कान बंद ठेवले होते. संघ विचारसरणीच्या लोकांकडून दडपण आल्यानंतरही त्यांनी आर्थिक सुधारणेला पाठिंबा देण्यापासून घुमजाव केले नाही.
अडवाणी हे कट्टर हिंदुत्ववादी. त्यांचे सर्वच विचार वाजपेयी यांना पटत होते असे नाही. भाजपच्या राम रथयात्रेत वाजपेयी स्वतः कधी सामील झाले नव्हते. पाकिस्तानविषयी अडवाणींची भूमिका कडक होती पण वाजपेयी यांनी पाकिस्तान हे आपले शेजारी राष्ट्र आहे, हे कायम लक्षात ठेऊन पाकिस्तानशी
संबंध चांगले राखण्यासाठी पावले उालली. वाजपेयी पंतप्रधान असताना फेब्रुवारी 1999 मधे दिल्ली- लाहोर बस सुरू झाली आणि अवघ्या तीन महिन्यात पाकिस्तानने कारगिलवर हल्ला केला. पाकिस्तानचे हे कृत्य अत्यंत संतापजनक होते, चीड आणणारे होते. पण वाजपेयी विचलीत झाले नाहीत. त्यांनी संयम सोडला नाही. त्यांनी हल्ला परतवून लावला. पाकिस्तानी सैन्याला परतवून लावले. पण त्यानंतरही त्यांनी पाकिस्तान बरोबरचे चर्चेचे दरवाजे बंद केले नाहीत. कारगिल युध्दाचे शिल्पकार पकिस्तानचे अध्यक्ष जनरल परवेज मुशμर्रफ यांना आग्रा शिखर परिषदेसाठी वाजपेयींनी निमंत्रण दिले. त्या शिखर परिषदेतून काहीच निष्पन्न झाले नाही, साधे दोन्ही देशांचे संयुक्त पत्रकही प्रसिध्दीसाठी निघाले नाही. पण वाजपेयींनी पाकिस्तानवर कधी आगपाखड केली नाही.
पी. व्ही. नरसिंह राव हे वाजपेयींचे मित्र होते. नरसिंह राव पंतप्रधान होते. डॉ. मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते. त्यांनी मांडलेल्या बजेटवर विरोधी पक्षाने सडकून टीका केली. डॉ. सिंग हे काही राजकारणी नव्हेत. ते अर्थतज्ञ आहेत. टीकेने ते दुखावले गेले. नरसिंह राव वाजपेयींकडे भेटायला आले. मनमोहन सिंग यांच्यावर एवढी टीका कशासाठी करता, असा प्रश्न त्यांनी विचारला. वाजपेयी म्हणाले- संसदीय लोकशाहीत विरोधी पक्ष आपली भूमिका पार पाडत असतो. त्यात वैयक्तिक टीका कोणावर नसते.
1971 मधे भारताने पाकिस्तान विरोधी युध्द जिंकले व बांगला देशची निर्मिती झाली. वाजपेयींनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना दुर्गा म्हणून उपमा दिली होती. चार वर्षानी देशावर इंदिराजींनी आणिबाणी लादली. 1975 ते 1977 या काळात 21 महिने वाजपेयी तुरुंगात होते.
13 डिसेंबर 2001 रोजी संसद भवनावर पाकिस्तान प्रेरीत दहशतवाद्यांनी हल्ला केला. पंतप्रधान वाजपेयी संसदेत होते. हल्ला झाला तेव्हा, सोनिया गांधी त्यांच्या घरी होत्या. सर्व देशाने त्याचे चित्रिकरण टीव्हीच्या पडद्यावर लाईव्ह बघितले. सोनिया गांधींनी तत्काळ वाजपेयींनी फोन केला व त्यांची विचारपूस केली. दुसर्या दिवशी वाजपेयी लोकसभेत म्हणाले- या देशाची लोकशाही मजबूत व सुरक्षित आहे. कारण देशावर संकट येते तेव विरोधी पक्ष सरकारच्या पाठिशी उभा राहतो…
मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते. भारताने जागतिक व्यापार संघटनेबरोबर करार केल्याने पेटंट विधेयकात सुधारणा करणे गरजचे होते. राज्यसभेत भाजप व डाव्या पक्षाने त्याला जोरदार विरोध करून सुधारणा विधेयक दोन वेळा नामंजूर केले. दरम्यान सरकार बदलले. वाजपेयी पंतप्रधान झाले व मुरसोली मारन वाणिज्य मंत्री होते. त्यांनी हेच सुधारणा विधेयक संसदेत आणले. काँग्रेसच्या काळातील तो मसुदा होता. काँग्रेस विरोधी पक्षात असल्याचे काँग्रेसची पंचाईत झाली. काँग्रेस पाठिंबा द्यायला तयार होईना तेव्हा वाजपेयी त्या विधेयकाची प्रत हातात घेऊन प्रणव मुखजvना म्हणाले- अहो ही तुमची बेबी आहे.. तेव्हा तुम्ही पाठिंबा द्या….
संघर्षाचे नव्हे तर सहमतीचे राजकारण कसे करावे हे वाजपेयींनी दाखवून दिले. मोरारजी देसाई, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर, व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आघाडी सरकारे स्थापन झाली पण ती अस्थिर होऊन कोसळली. बिगर काँग्रेसचे आघाडी सरकार यशस्वी करून दाखवणारे वाजपेयी हे देशातले पहिले नेते होते.
तेरा दिवसांचे सरकार पडल्यावर वाजपेयी म्हणाले- सत्ता का खेल तो चलेगा, सरकारे आयेगी, जायेगी. पार्टीया बनेगी, बिगडेगी. मगर ये देश रहना चाहिए, इस देशका लोकतंत्र अमर रहेना चाहिए.
सुकृत खांडेकर