Saturday, July 18, 2020

राज्यसभेच्या नवनिर्वाचीत खासदारांचा 22 जुलैला शपथविधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या 22जुलै रोजी राज्यसभेत नवनिर्वाचिक राज्यसभा खासदारां च्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यसभेच्या चेंबरमध्ये होणा-या या शपथविधी सोहळण्यासाठी ६१ सदस्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण लक्षात घेऊन, या कार्यक्रमादरम्यान योग्य ती खबरदारी घेण्यात येईल.
सूत्रांनी सांगितल्यानुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करता यावे, यासाठी पहिल्यांदाच शपथविधी सोहळा सभागृहाच्या चेंबरमध्ये इंटर-सेशन पीरियडदरम्यान पार पडेल. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 20 राज्यातील 61 सदस्य राज्यसभेवर निवडून गेले होते.
या निवडणुकीत मोठ्या चेह-यांबाबत बोलायचे झाल्यास, मध्यप्रदेशातून भाजपचे ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेसचे दिग्विजय सिंह विजयी झाले. हे दोन्ही नेते, 2019च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तसेच, काँग्रेसचे संघटना महासचिव केसी वेणुगोपाल राजस्थानमधून विजयी झाले होते. राज्यसभेच्या 19जागांसाठी 19जूनला झालेल्या निवडणूकीत भाजपला 8आणि काँग्रेस ला 4 जागांवर विजय मिळाला होता. मागच्या वेळेस या 19 जागांपेकी भाजपला 9 आणि काँग्रेसला 6 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे, यावेळी भाजपला 1 आणि काँग्रेसला 2 जागांवर पराभवाचा सामना करावा लागला.
माझा देशा 

Thursday, August 23, 2018

अटल अध्यायाची सांगता

संघर्षाचे नव्हे तर सहमतीचे राजकारण कसे करावे हे वाजपेयींनी दाखवून दिले. मोरारजी देसाई,एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर, व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आघाडी सरकारे स्थापन झाली पण ती अस्थिर होऊन कोसळली. बिगर काँग्रेसचे आघाडी सरकार यशस्वी करून दाखवणारे वाजपेयी हे देशातले पहिले नेते होते….
भारतीय जनता पक्ष जो काही आहे तो अटल बिहारी वाजपेयींमुळे. जनता पक्षातून बाहेर पडून 1980 मधे वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी पुढाकार घेऊन भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. 1984 मधे पक्षाने पहिल्याच लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अवघे दोनच खासदार निवडून आले होते. पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांचाही त्यावेळी दारूण पराभव झाला होता. अवघ्या दोन खासदारांपासून या पक्षाची सुरूवात झाली आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 282 खासदार निवडून आले. भाजपला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले ही किमया जरी मोदी लाटेची होती तरी या पक्षाचा पाया वाजपेयींनी रचला आहे, पक्षाच्या पाठिशी वाजपेयींची पुण्याई आहे, वाजपेयींचे परिश्रम, राजकीय कौशल्य व मुत्सद्दीपणा आहे.वाजपेयींचे सर्वसमावेशक नेतृत्व हे सर्वात महत्वाचे आहे. पक्षाच्या विस्तारामागे वाजपेयींचे अमोघ वक्तृत्व आणि संघटन कौशल्य आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे विद्यमान कारभारी असले तरी त्यांच्या कामाची तुलना ही वाजपेयी- अडवाणींच्या कारकिर्दीशी केली जाते.
वाजपेयी हे सार्वजनिक जीवनातील उत्तुंग व्यक्तिमत्व होते. ते सर्वांना हवेसे वाटायचे. ते खूप मोठे नेते आहेत पण चुकीच्या पक्षात आहेत असे काँग्रेसच्या मोठ मोठय़ा नेत्यांनी बोलून दाखवले आहे. वाजपेयी हा पक्षाचा मुखवटा आहे, असे गोविंदाचार्य यांनी स्वतःच म्हटले होते. काँग्रेससह विरोधी पक्षांनी वाजपेयांना नेहमीच आदर दिला पण भाजपची भूमिका व धोरणे त्यांना मान्य नसत. केंद्रात एनडीए ( राष्ट्रीय लोकशाही आघाडी ) चे सरकार स्थापन झाले ते वाजपेयींमुळेच. एनडीएची निर्मिती आणि बिगर काँग्रेस सरकारची स्थापना केंद्रात झाली त्याचे श्रेय केवळ वाजपेयींना जाते. द्रमुक, अण्णा द्रमुक, तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, तेलगु देशम, आसाम गण परिषद, समता पक्ष अशा चोवीस पक्षांची मोट बांधून केंद्रात एनडीचे सरकार चालले ते वाजपेयींच्या नेतृत्वामुळेच. भाजप हा जरी लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता तरी एनडीए चे सरकार चालवण्याची क्षमता असलेला दुसरा नेता या पक्षात नव्हता हे वास्तव आहे. काँग्रेस विरोधी प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याची किमया वाजपेयींनी करून दाखवली आणि अनेक आंतर बाह्य संकटे येऊनही त्यांनी पाच वर्षे देशाला स्थिर सरकार दिले.
बाबरी मशिद उध्दवस्त झाल्यावर 1996 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप निवडून आला होता. सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रपतींनी भाजपला केंद्रात सरकार बनवण्याची संधी दिली. बाबरी पाडणारा पक्ष म्हणून भाजपपासून त्या काळात अन्य राजकीय पक्ष दूर असायचे. शिवसेना आणि अकाली दल हेच केवळ भाजपचे नैसर्गिक व जुने मित्र भाजपबरोबर होते. बहुमत नसल्याने वाजपेयींचे सरकार अवघ्या तेरा दिवसात कोसळले. 1998 च्या निवडणुकीत पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले. त्यात वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष होते. जयललिता यांनी सतत दबावाचे राजकारण चालवले आणि सरकारचा पाठिंबा काढून घेतला. वाजपेयी सरकारला अविश्वासाच्या ठरावाला लोकसभेत सामोरे जावे लागले. आदल्या रात्री मायावतींनी शब्द फिरवला व सरकारला विरोध करण्याचा निर्णय घेतला त्याचा परिणाम वाजपेयींचे दुसरे सरकार अवघ्या तेरा महिन्यात कोसळले व पुन्हा देशाला मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागले. 1999 च्या निवडणुकीत पुन्हा भाजपच सर्वात मोठा पक्ष निवडून आला व वाजपेयींच्या नेतृत्वाखाली तिसर्यांदा सरकार स्थापन झाले. चोवीस घटक पक्षांना बरोबर घेऊन एनडीएचे सरकार त्यांना पाच वर्षे यशस्वीपण oचालवून दाखवले.
वाजपेयी जरी संघ परिवारातून आले होते तरी त्यांनी हिंदुत्व हिंदुत्व म्हणून कधी बँड वाजवला नाही. भाजपचे नेते म्हणून ते उजव्या विचारसरणीकडे कधी टोकाला झुकले नाहीत. कट्टरपंथी म्हणून त्यांनी कधीच कोणी संबोधले नाही. आघाडी सरकारचा धर्म पाळताना संघाची विचारसरणी त्यांनी कधी आड येऊ दिली नाही.
वाजपेयींनी एनडीए सरकार कसे चालवले म्हणून आज अनेक मित्र पक्ष मोदी- शहांना आठवण करून देतात. पण वाजपेयींच्या काळात भाजपला लोकसभेत कधीच निर्विवाद बहुमत मिळालेले नव्हते. त्या काळात पक्षाचे महाप्रचंड मार्केटींग नव्हते. जाहीरातबाजी नव्हती. इव्हेंट चे फॅड नव्हते. धुव्वाधार पैशाचा खेळही नव्हता. सर्वात महत्वाचे जुमलेबाजी तर पक्षात मुळीच नव्हती.
भाजप हा स्वदेशी चा पुरस्कर्ता. भाजपशी संलग्न असलेली स्वदेशी जागरण मंच ही संघटना आवाज उठवत असते. पण नरसिंह राव हे पंतप्रधान असताना त्यांनी घेतलेल्या आर्थिक सुधारणा व उदारीकरणाच्या धोरणाला वाजपेयी यांनी विरोधी पक्षाच्या बाकांवरून पाठिंबा दिला होता. जग कुठे चालले आहे, जगाने आर्थिक धोरणाची दिशा काय स्वीकारली आहे, याचे भान त्यांना होते. आर्थिक सुधारणेला संघाने व स्वदेशी मंचाने विरोध केला होता. टीका चालू असताना वाजपेयींनी आपले कान बंद ठेवले होते. संघ विचारसरणीच्या लोकांकडून दडपण आल्यानंतरही त्यांनी आर्थिक सुधारणेला पाठिंबा देण्यापासून घुमजाव केले नाही.
अडवाणी हे कट्टर हिंदुत्ववादी. त्यांचे सर्वच विचार वाजपेयी यांना पटत होते असे नाही. भाजपच्या राम रथयात्रेत वाजपेयी स्वतः कधी सामील झाले नव्हते. पाकिस्तानविषयी अडवाणींची भूमिका कडक होती पण वाजपेयी यांनी पाकिस्तान हे आपले शेजारी राष्ट्र आहे, हे कायम लक्षात ठेऊन पाकिस्तानशी
संबंध चांगले राखण्यासाठी पावले उालली. वाजपेयी पंतप्रधान असताना फेब्रुवारी 1999 मधे दिल्ली- लाहोर बस सुरू झाली आणि अवघ्या तीन महिन्यात पाकिस्तानने कारगिलवर हल्ला केला. पाकिस्तानचे हे कृत्य अत्यंत संतापजनक होते, चीड आणणारे होते. पण वाजपेयी विचलीत झाले नाहीत. त्यांनी संयम सोडला नाही. त्यांनी हल्ला परतवून लावला. पाकिस्तानी सैन्याला परतवून लावले. पण त्यानंतरही त्यांनी पाकिस्तान बरोबरचे चर्चेचे दरवाजे बंद केले नाहीत. कारगिल युध्दाचे शिल्पकार पकिस्तानचे अध्यक्ष जनरल परवेज मुशμर्रफ यांना आग्रा शिखर परिषदेसाठी वाजपेयींनी निमंत्रण दिले. त्या शिखर परिषदेतून काहीच निष्पन्न झाले नाही, साधे दोन्ही देशांचे संयुक्त पत्रकही प्रसिध्दीसाठी निघाले नाही. पण वाजपेयींनी पाकिस्तानवर कधी आगपाखड केली नाही.
पी. व्ही. नरसिंह राव हे वाजपेयींचे मित्र होते. नरसिंह राव पंतप्रधान होते. डॉ. मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते. त्यांनी मांडलेल्या बजेटवर विरोधी पक्षाने सडकून टीका केली. डॉ. सिंग हे काही राजकारणी नव्हेत. ते अर्थतज्ञ आहेत. टीकेने ते दुखावले गेले. नरसिंह राव वाजपेयींकडे भेटायला आले. मनमोहन सिंग यांच्यावर एवढी टीका कशासाठी करता, असा प्रश्न त्यांनी विचारला. वाजपेयी म्हणाले- संसदीय लोकशाहीत विरोधी पक्ष आपली भूमिका पार पाडत असतो. त्यात वैयक्तिक टीका कोणावर नसते.
1971 मधे भारताने पाकिस्तान विरोधी युध्द जिंकले व बांगला देशची निर्मिती झाली. वाजपेयींनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना दुर्गा म्हणून उपमा दिली होती. चार वर्षानी देशावर इंदिराजींनी आणिबाणी लादली. 1975 ते 1977 या काळात 21 महिने वाजपेयी तुरुंगात होते.
13 डिसेंबर 2001 रोजी संसद भवनावर पाकिस्तान प्रेरीत दहशतवाद्यांनी हल्ला केला. पंतप्रधान वाजपेयी संसदेत होते. हल्ला झाला तेव्हा, सोनिया गांधी त्यांच्या घरी होत्या. सर्व देशाने त्याचे चित्रिकरण टीव्हीच्या पडद्यावर लाईव्ह बघितले. सोनिया गांधींनी तत्काळ वाजपेयींनी फोन केला व त्यांची विचारपूस केली. दुसर्या दिवशी वाजपेयी लोकसभेत म्हणाले- या देशाची लोकशाही मजबूत व सुरक्षित आहे. कारण देशावर संकट येते तेव विरोधी पक्ष सरकारच्या पाठिशी उभा राहतो…
मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते. भारताने जागतिक व्यापार संघटनेबरोबर करार केल्याने पेटंट विधेयकात सुधारणा करणे गरजचे होते. राज्यसभेत भाजप व डाव्या पक्षाने त्याला जोरदार विरोध करून सुधारणा विधेयक दोन वेळा नामंजूर केले. दरम्यान सरकार बदलले. वाजपेयी पंतप्रधान झाले व मुरसोली मारन वाणिज्य मंत्री होते. त्यांनी हेच सुधारणा विधेयक संसदेत आणले. काँग्रेसच्या काळातील तो मसुदा होता. काँग्रेस विरोधी पक्षात असल्याचे काँग्रेसची पंचाईत झाली. काँग्रेस पाठिंबा द्यायला तयार होईना तेव्हा वाजपेयी त्या विधेयकाची प्रत हातात घेऊन प्रणव मुखजvना म्हणाले- अहो ही तुमची बेबी आहे.. तेव्हा तुम्ही पाठिंबा द्या….
संघर्षाचे नव्हे तर सहमतीचे राजकारण कसे करावे हे वाजपेयींनी दाखवून दिले. मोरारजी देसाई, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर, व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आघाडी सरकारे स्थापन झाली पण ती अस्थिर होऊन कोसळली. बिगर काँग्रेसचे आघाडी सरकार यशस्वी करून दाखवणारे वाजपेयी हे देशातले पहिले नेते होते.
तेरा दिवसांचे सरकार पडल्यावर वाजपेयी म्हणाले- सत्ता का खेल तो चलेगा, सरकारे आयेगी, जायेगी. पार्टीया बनेगी, बिगडेगी. मगर ये देश रहना चाहिए, इस देशका लोकतंत्र अमर रहेना चाहिए.

                                                 सुकृत खांडेकर

Monday, January 8, 2018

आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या संधी

         डॉ.अस्मिता वेले यांचे प्रतिपादन; 'केशायुर्वेद'तर्फे 
                  आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

पुणे(प्रतिनिधी):- "युरोपीय देशांसहित जगभरात आयुर्वेदाबाबत जागृती वाढत आहे. अनेक देश आयुर्वेदाला मुख्य उपचारपद्धती म्हणून स्वीकारू पाहत आहेत. त्यामुळे आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारताकडे योग आणि आयुर्वेद निर्यात करण्यासारख्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. संशोधनात्मक आयुर्वेद पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत" असे प्रतिपादन हंगेरीतील भारतीय दूतावासातील आयुष विभागाच्या अध्यक्षा डॉ. अस्मिता वेले यांनी केले.
भारतातील पहिले आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेद आणि बीव्हीजी इंडिया तर्फे सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेम्बर ऑफ कॉमर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृहात आयो जित आयुर्वेदावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी 'आंतरराष्ट्रीय स्तवरावर आयुर्वेद' या विषयावर डॉ. अस्मिता वेले बोलत होत्या. याप्रसंगी बुकगंगा इंटरनॅशनलचे संचालक मंदार जोगळेकर, केशा युर्वेदचे संस्थापक डॉ. हरीश पाटणकर, बीव्हीजीचे उपाध्यक्ष डॉ. दत्ताजी गायकवाड, डॉ. अजित कोल्ह टकर, आयुर्वेदाचार्य डॉ. सुकुमार देशमुख,डॉ. अस्मा इनामदार, डॉ. प्रियांका चोरगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी केशायुर्वेदचे जगभरात 50 उपकेंद्र झाल्याबद्दल केंद्रप्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
 डॉ. अस्मिता वेले म्हणाल्या, "वैद्यांनी प्रत्येक गोष्टीचा दस्तावेज ठेवला पाहिजे. आयुर्वेद सर्व देशांपर्यंत पोहोचू लागले आहे. भारत सरकारचे आयुष मंत्रालयही त्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक देशात आयुषमार्फत भारतीय दूतावासात आयुर्वेदाचे अध्यासन स्थापन केले जात आहे. त्यामुळे परदेशात नव्याने आयुर्वेदात काम करू पाहणाऱ्यांना संधी आहेत. त्याचा फायदा भारतीय वैद्यांनी घेत आपल्या भारतीय आयुर्वेदाचा जगभर प्रसार केला पाहिजे."
मंदार जोगळेकर म्हणाले, "इंटरनेटमुळे वैद्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सोशल मीडियासह इतर नवमाध्यमांचा आयुर्वेद प्रसारासाठी वापर केला पाहिजे. आपापसांतील संवाद वाढविण्यासाठी आणि ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी 'वेबिनार'चा प्रभावी वापर केला पाहिजे." डॉ.हरीश पाटणकर म्हणाले, "केशा युर्वेद हे आयुर्वेदाला तत्रंज्ञानाची जोड देऊन विकसित केलेले संशोधन आहे. अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद आनंददायी असून, येत्या वर्षभरात शंभर उपकेंद्र सुरु करण्याचा मानस आहे. योगापाठोपाठ आता आयुर्वेदही जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रशियात योग आणि आयुर्वेदाला महत्व दिले जात असून, नव्याने या क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी सद्यस्थिती अनुकूल आहे."
"युरोप आणि जपान आता पर्यायी औषधे म्हणून आयुर्वेदाला स्वीकारत आहे. परंतु, पुराव्यांवर त्यांचा अधिक भर आहे. तुमच्याकडे ज्ञान, सादरीकरण, नाविन्यता आणि तेथील कायदेशीर बाबींची जाण असेल,तर चांग ल्या पद्धतीने तुम्ही आयुर्वेद रुजवू शकता," असे डॉ.सुकुमार देशमुख यांनी 'युरोप व जपानमधील आयुर्वेदाला असणाऱ्या संधी' या विषयावर बोलताना सांगितले. डॉ. अस्मा इनामदार 'दुबईमधील आयुर्वेदाला असणाऱ्या संधी' या विषयावर मार्गदर्शन केले. दुबई हे वैद्यकीय पर्यटन म्हणून विकसित होत असल्याचे त्या म्हणाल्या. 'जर्मनीमधील आयुर्वेदाला असणाऱ्या संधी' या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. प्रियांका चोरगे म्हणाल्या, "जर्मन भाषा अवगत करण्यासाठी तेथील लोक आणि सरकार तुम्हाला मदत करते. त्यामुळे भाषेचा फारसा अडसर राहत नाही. विविध कोर्सेस आणि समुदेशन सत्रातून आपण आयुर्वेद पोहोचवू शकतो." डॉ. भावना उपाध्याय यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दत्ताजी गायकवाड यांनी आभार मानले.

Wednesday, November 22, 2017

वेशीवरच्या पाऊलखुणा : हट्टी गाव : रमेश पडवळ

संस्कृती जोपासण्यासाठी `ते’ झाले हट्टी !

परदेशी आक्रमणे आणि कालांतराने होत असलेल्या बदलांमध्ये अनेक संस्कृती, प्रथा व परंपरा वाहून जातात. मात्र महाराणा प्रतापांच्या भूमीतून लढायांदरम्यान चारशे-पाचशे वर्षांपूर्वी नाशिकमध्ये आलेले लोक येथेच स्थिरावले; पण त्यांनी त्यांची संस्कृती, प्रथा व परंपरांना हट्टाने आपल्यातून जीवंत ठेवले. महाराष्ट्राशी, नाशिकशी एकरूप होताना आपल्यातील वेगळेपणाही हट्टी होऊन जपला. हे गाव अजूनही एकमेकांशी हिंदीतून संवाद साधते. अनेक परंपरा मूळ राजस्थानी पद्धतीनेच जपते! या गावाच्या प्रवासाच्या ऐतिहासिक पाऊलखुणा ठसठशीत नसल्या तरी त्या आपल्याशीही संवाद साधतात अन् आम्ही ‘हट्टी’ आहोत, असे सांगत राहतात.
                                                                                                    रमेश पडवळ

आपल्या संस्कृती आणि परंपरांविषयी हट्टी असलेल्या लोकांच्या गावाचे नावही हट्टी असेच आहे. नावात हट्ट असल्याने त्यांच्यातील वेगळेपणा जाणवायला लागतो. हट्टीगाव चांदवड तालुक्यात येते. पण वणीपासून (ता. दिंडोरी) 15 किलोमीटरवर हे गाव आहे. धोडप (धारपवणिक) किल्ल्याच्या पायथ्याशी हे गाव चारशे-पाचशे वर्षांपासून वसले आहे. गावात राजपुतांची 60-70 कुटुंब असून गावची लोकसंख्या साधारण हजार आहे. एक-दोन कुटुंब सोडली तर सर्व घरे राजपुतांची आहेत. राजस्थान येथील चितोडगड हे त्यांचे मूळ. महाराणा प्रतापांच्या राज्यविस्तारादरम्यान त्यांच्या सोबत आलेल्या कबिल्यांनी धोडपच्या पायथ्याशी असलेल्या अंमरापूर या गावात आश्रय घेतला, असे म्हटले जाते. महाराणा प्रतापांच्या मृत्यूनंतर (1597) मुस्लिम आक्रमणे व अत्याचार वाढल्याने चितोडमधील अनेक राजपूत सुरक्षित ठिकाणाच्या शोधात धोडपच्या पायथ्याशी आल्याचे म्हटले जाते. त्यांची आडनावे सिसोदिया, गेहरवाल, बायस, चौहान, शेखावत अशी आहेत. मात्र येथे आल्यावर येथील लोकांच्या दृष्टीने ते परदेशी होते. त्यामुळे त्यांना परदेशी म्हटले जाऊ लागले. त्यामुळे येथील प्रत्येक कुटुंबाचे आडनावही परदेशी आहे. मात्र त्यांचे मूळ आडनाव वेगळे असल्याने त्यानुसार परदेशी परदेशींमध्ये रोटीबेटी व्यवहार होतात.
धोडप किल्ल्याची चढाई जेथून सुरू होते तेथे एक हनुमानाची साधारण चार फूट उंचीची मूर्ती आहे. हा हनुमान अंमरापूर या गावातला. हनुमानाचे पक्के मंदिर नाही पण आजूबाजूला पाहिले की येथे पूर्वी गाव होते हे लक्षात येते. अंमरापूरच्या आजूबाजूला अनेक गावे होती; पण कालांतराने ती नाहीशी झाली. त्याच्या खाणाखुणा तेथे पाहायला मिळतात. पूर्वी राजपूत लोक या गावात राहायचे, पण त्यांनी अंमरापूरपासून वेगळे व्हायचे ठरविले अन् ते खालच्या बाजूला वसले. त्यांच्या या हट्टीपणामुळे त्यांना हट्टी म्हटले जाऊ लागले अन् त्या गावचे नावच हट्टी पडले, असे म्हटले जाते. त्यांचा हट्ट त्यांच्या संस्कृतीशी होता अन् अजूनही आहे. ही सर्व कुटुंब एकमेकांशी हिंदीत बोलतात. त्यांचे शिक्षण मराठीतून होते, ते आता मुख्य प्रवाहातही आले आहेत. गावातील अनेक मुले प्राध्यापक, शिक्षक व चांगल्या नोकऱ्यांमध्ये आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी ते एकरूप झाले आहेत; पण काही मुळं खोल रोवली गेली आहेत. त्यात भाषेचा समावेश होतो.
`आम्हाला मराठी चांगले बोलता, लिहिता व वाचता येतं. आमची मुलं मराठी शाळेतूनच शिक्षण घेतात पण घरात आम्ही एकमेकांशी हिंदीतूनच बोलतो. याबाबत कसलाही लिखित नियम नाही. पण हे ओघाने होते,’ असे शिक्षक असलेले सुभाष परदेशी सांगतात. या कुटुंबियांचा पेहराव, अगदी घरातील देवघर व त्यातील देव सर्व काही मराठी पद्धतीचेच दिसते. गावात हनुमान मंदिर, महादेव मंदिर, गोरक्षनाथ मंदिर, शनी मंदिर इतर देवतांची लहान मोठी मंदिरे असून, त्याच्या देखभालीची जबाबदारीही गावकरीच घेतात. हट्टीगावातच खडेश्वर बाबांचा आश्रमही आहे. खडेश्वर बाबांचे मूळ नाव हेमाराम. तेही राजस्थानचेच आहेत. ते स्वत:ला महाराणा प्रतापांच्या सैन्यातील एक मानतात. तेरा वर्षांपूर्वी त्यांना आपली कर्मभूमी धोडप असल्याचा साक्षात्कार झाला अन् तेव्हापासून ते येथे आल्याचे सांगतात. ते कधीही पाठ टेकवित नाहीत. उभ्यानेच झोपतात म्हणून त्यांना खडेश्वर बाबा नाव पडले. हट्टीतील कुटुंबाचा मुख्य व्यवसाय दुधाचा आहे. नाशिकला दररोज ४०० किलो खवा पुरविण्याचे काम हट्टी व आजूबाजूची गावे करतात. हट्टीगावचा खवा गुलाबजामसाठी प्रसिद्ध आहे. दुधाच्या व्यवसायासह आता हट्टीतील कुटुंब शेतीकडेही वळली आहेत. गावात फूड प्रोसेंसिंगचे दोन कारखाने आहेत त्यामुळे रोजगाराला हातभार लागला आहे.
हट्टीतील परदेशी राजपुतांची कुलदेवता अजमेरची शाकंबरी माता ही आहे. या मातेचा उत्सव ते साजरे करतात. तसेच संत मिराबाईचा पुण्यतिथी सप्ताह सोहळाही गावात होतो. पूर्वी हट्टीमध्ये बोहाडेही व्हायचे, मात्र ही परंपरा कालांतराने मागे पडली. येथील अनेक कुटुंबांमध्ये बोहाड्यांची पात्रे परंपरेने नाचविली जायची. मात्र आता फक्त लग्नांमध्ये सोंगे नाचविली जातात; पण ती फक्त सोहळ्याचा भाग म्हणूनच. हट्टीत लग्नाचा कार्यक्रम तब्बल पाच दिवस चालतो. आता तो दोन दिवसांवर आला आहे. मात्र लग्नात म्हणजे भवरी साजरी करण्यात हट्टी गावचे लोक प्रचंड हट्टी आहेत.
मंगनी, कुंमकुंम सोहळा, हलदी, रथयात्रा, मंडवा, देवप्रतिष्ठान, लेलचवजा, बारात, सातफेरे, बिदाई असा भरगच्च कार्यक्रम म्हणजे त्यांचा लग्नसोहळा असतो. रथजत्रा म्हणजे तेथील महिला कुलदेवतेची आराधना करतात. मात्र इतर सर्व सण व उत्सव हे महाराष्ट्र पद्धतीनेच साजरे केले जातात. लग्नात नवरदेवाकडे कट्याराऐवजी तलवार असते. या तलवारीला महाराणा प्रतापांची तलवार म्हटले जाते, असे येथील ज्येष्ठ राजाराम सिंग-परदेशी सांगतात. लग्नातील सर्वात महत्त्वाची गंमत म्हणजे हट्टीतील लग्न पूर्वी पहाटे चार वाजता लागायची. अजूनही ती लागतात. यात बदल होत आहे, मात्र इंग्रजांच्या जाचामुळे दिवसा सण, उत्सव साजरा करता येत नव्हते, त्यामुळे पहाटे पहाटे असे सोहळे साजरे करण्याची पद्धत ‌पडली, असेही म्हटले जाते.
हट्टीगावची एक वेगळी ओळख म्हणजे सात एकर क्षेत्रावर होत असलेले निसर्ग पर्यटन केंद्र व धाडसी खेळांचे केंद्र. निसर्ग पर्यटन केंद्र, उपाहारगृह, अॅडव्हेंचर स्पोर्टस्‌ कॅम्पस, पर्यटकांच्या मुक्कामासाठी सेजगृहे, तसेच तंबूची व्यवस्था करण्यात येत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या नव्या पर्यटन केंद्रामुळे येथील गाइड (वाटाड्या) म्हणून व अॅडव्हेंचर स्पोर्टस्‌ अॅक्‍टिव्हिटीजमध्ये हट्टी गावातील युवकांनी पुढाकार घेतला आहे. यामुळे पर्यटकांचा ओढा या गावाकडे वाढला आहे. धोडपला जाणार प्रत्येकजण हट्टी गावात काही काळ स्थिरावतो. पुरातत्त्व विभागाने धोडपच्या पायथ्याशी उत्खनन केले, तर मोठा इतिहास समोर येईल. किल्ल्यावरील गवळीवाडीतील ताम्रपटांचे वाचनही व्हायला हवे. हे ताम्रपट निजामकाळातील आहेत. हट्टी परिसरात अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. याचाही अभ्यास होण्याची गरज आहे. हट्टीगाव आपल्या वेगळेपणातून संस्कृतीच्या पाऊलखुणा जपण्याचा प्रयत्न करीत असल्याने ते वेगळे भासते.

Saturday, February 15, 2014

शिवसेना समन्वयकपदी दत्तात्रय सुर्वे यांची निवड...

पौड:-शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांचे आदेशावरून ,शिवसेना नेते ,पुणे जिल्हा संपर्कनेते मा.गजानन किर्तीकर यांनी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख आणि मुळशी पंचायत समितीचे माजी गटनेते दत्तात्रय नारायण सुर्वे यांची "शिवसेना जिल्हा समन्वयक पदी " निवड केली असून त्यांचेकडे भोर आणि पुरंधर विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दत्तात्रय सुर्वे हे मुळशी तालुक्यातील शिवसेना स्थापनेतील एक प्रमुख असून त्यांनी आजवर शिवसेना तालुका प्रसिद्धीप्रमुख,जिल्हा सचिव,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख,मुळशी तालुकाप्रमुख,शिवसेना मुळशी पंचायत समिती पक्ष प्रतोद,गटनेते ,भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख,जिल्हा उप प्रमुख,आशी पक्षाची विविध पदे भूषविली असून २००७ च्या पंचायत समिती निवडणुकीत ते आंबवणे गणातून निवडून आले होते,जिल्ह्यातील एक अभ्यासू पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांचा लौकिक झाला होता.त्यांनी पंचायत समिती कार्यकालात अनेक महत्वाची विकासकामे मार्गी लावली आहेत.
मुळशी तालुक्यातील अनेक निवडणुकात त्यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे.सुर्वे यांची "शिवसेना जिल्हा समन्वयक पदी " निवड झालेबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख ,माजी आम.शरद ढमाले ,लोकप्रिय आमदार विजयबापू शिवतरे ,तालुकाप्रमुख रविकांत धुमाळ,सुनील जागडे,गणेश बागल,श्री .यादव ,महिला आघाडी जिल्हा संघटक शोभाताई पासलकर आदींनी त्यांचे आभिनदन केले असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्या दिल्या आहेत.

Wednesday, November 20, 2013

दै.झुंजार मावळा चे संपादक दत्तात्रय सुर्वे यांना गोवा रत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार



दै.झुंजार मावळा चे संपादक दत्तात्रय सुर्वे यांना गोवा रत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार

पुणे(प्रतिनिधी) :-पुरस्कार विजेत्यांची राष्ट्रीय चळवळ असलेल्या ""भारतीय पुरस्कार विजेते संघ"या सामाजिक व सेवाभावी संस्थेच्या वतीने या वर्षीचा सर्वोत्कृष्ठ व अती महत्वाचा मनाला जाणारा "गोवा रत्न आंतर राष्ट्रीय पुरस्कार पुणे येथील दै.झुंजार मावळा चे संपादक श्री.दत्तात्रय सुर्वे यांना गोवा येथे नुकताच शिवसेनेचे उपनेते ,माजी आमदार ,आनंत तरे यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
गोवा युनिव्हरसिटी च्या दि इंटर नस्नल सेंटर डोनापावला येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास शिवसेना उपनेते अनंत तरे ,श्री .जयेंद्र खुणे, चित्रपट निर्माते प्रसाद तारकर ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शांताराम कारंडे ,महाराष्ट्र कोळी समाज संघटक दीपक सेठ भोइर,गोवा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जनार्धन भंडारी, आर.सी.एफ कंपनीचे उपाध्यक्ष रामचंद्र नाईक, डॉ.शेखर धुमाळ ,अभिषेख अलगीकर, डॉ .सुधीर तारे, गायक प्रवीण कुंवर ,जगदीश पाटील,कु. भारती मढवी,डॉ.संजुक्ता महापात्रा,वर्षा विद्या विलास, भारतीय पुरस्कार विजेते संघाच्या सरचिटणीस सौ. सारिका पाटील ,बेळगावचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.मधुकर ,शशिकांत खानविलकर ,बाळकृष्ण वाणी ,कारण पाटील आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
"गोवा रत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार" विजेते दै.झुंजार मावळा चे संपादक दत्तात्रय सुर्वे यांनी सन .१९८२-८३ मध्ये मुंबई येते सर्वप्रथम "दै.मुंबई सकाळ " येथे पत्र लेखनाने आपल्या पत्रकारितेस सुरुवात केली .त्यानंतर पुणे येथे आल्यानंतर "श्रमिक विचार "या दैनिकातील एका लेखाने त्यांना जीवघेण्या हल्ल्याला सामोरे जावे लागले.सामाजिक व विकासात्मक पत्रकारिता हा धागा धरून त्यांनी पुढील वाटचाल चालू ठेवली .श्री.दत्तात्रय सुर्वे यांनी पुणे येथे सर्वप्रथम दै.तरुण भारत,रामभूमी,दै.गावकरी,दै.प्रहार, केसरी,प्रभात,सांज समाचार, पुढारी, स्वराज्य, संध्या ,वर्तमान ,राष्ट्रतेज, मार्मिक, गावकरी ,लोकायत आदी दैनिकात लेखन केले.त्यानंतर दै.सामना चा पुणे जिल्ह्यातील प्रारंभ त्यांनी श्री.हरीश केन्ची,राज्जाभाऊ रायकर यांच्या माध्यमातून केला .काही काल दै.सामानाचे वितरण देखी केले.ते मुळशी तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत होते.
दत्तात्रय सुर्वे यांनी १९८९ साली प्रथमता: मुळशी तालुक्यातून "पाक्षिक शिवतेज"सुरु केले.त्याचे प्रकाशन दादा कोंडके यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले.१९९३ साली त्यांनी मुळशी तालुक्याचे मुखपत्र ठरावे आसे "साप्ताहिक मुळशी दिनांक" शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते दि.१७ ऑगस्ट १९९३ रोजी मातोश्री बंगल्यावर केले.नंतर २००७ मध्ये "मासिक शिवमार्ग" साप्ताहिक "शिवराष्ट्र" आणि १९फेब्रुवारी २०११ रोजी दैनिक "झुंजार मावळा" या ग्रामीण भागातून प्रसिद्ध होणारे मराठी दैनिक सुरु करून एक नवक्रांती केली .कोणतेही आर्थिक व राजकीय पाठबळ नसताना ते हे दैनिक "झुंजार मावळा"यशस्वीपणे चालवीत आहेत.दत्तात्रय सुर्वे प्रकाशित करीत असलेल्या "शिवतेज" आणि "शिवमार्ग" दिवाळी अंकास आजवर सुमारे १५च्या वर विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.तसेच ते महाराष्ट्र साप्ताहिक संपादक परिषद ,पुणे जिल्हा अध्यक्ष ,पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ,आल इंडिया स्माल अंड मेडियम न्यूज पेपर आसोसिअशन चे सदस्य म्हणून देखील पत्रकारितेची सेवा करीत आहेत.सुर्वे यांचा अनेक सामाजिक ,राजकीय संस्थांशी जवळचा समंध असून त्याचे पदाधिकारी ,सदस्य म्हणून यशस्वीपने जबाबदारी पार पाडीत आहेत.
श्री .दत्तात्रय सुर्वे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मुळशी तालुक्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून राजकारणातही आपला वेगळा ठसा उमटविला आहे.मागील पंचायत समिती च्या निवडणुकीत ते निवडून आले होते.त्यांनी पत्रकारितेच्या जोरावर "पुणे-ताम्हिणी-कोलार "हा महामार्ग तडीस नेला.त्यांनी केलेल्या काही कामा मध्ये पुढील काही कामांचा उल्लेख करता येईल...
१) पौड ग्रामीण रुग्णालय इमारत ...२) भरे येथील आय .टी.आय .इमारत..
३) मुळशी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना ४) मुळशी धरणग्रस्थानचे अनेक प्रश्न ...
५) टेमघर धरणं नामकरण ......इत्यादी ...
भारतीय पुरस्कार विजेते संघाने श्री.दत्तात्रय सुर्वे यांना "गोवा रत्न आंतर राष्ट्रीय पुरस्कार "देऊन गौरविल्यानेसंपूर्ण मुळशी तालुक्यातून त्यांचे आभिनंदन केले जात आहे.अनेकांनी दूर ध्वनिवरून त्यांना शुभेच्या दिल्या आहेत.

राज्यसभेच्या नवनिर्वाचीत खासदारांचा 22 जुलैला शपथविधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :   येत्या 22जुलै रोजी राज्यसभेत नवनिर्वाचिक राज्यसभा खासदारां च्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज...